१२] राळेगणसिध्‍दी व मा.अण्‍णा हजारे

सुपे (पारनेर तालुका),जिल्‍हा अहमदनगर महाराष्ट्र इथुन संत निळोबारायांच्‍या पिंपळनेरला संत श्रीपादबाबांच्‍या मार्गदर्शनाखाली गेली पंधरा सोळा वर्षापासून दिंडी सोहळा निघतो.समाजसेवक मा.अण्‍णा हजारे यांच्‍या राळेगणसिध्‍दी येथील समाजमंदिरात श्रीपादबाबांचे प्रवचन असायचं,स्‍वत:अण्णा उपस्थित राहून प्रवचनातील अमोलिक ज्ञान आत्‍मसात करत.अण्‍णा हे समाजसेवक तर आहेतच पण वारकरी व हरिभक्‍तपरायण आहेत.उत्‍तम व्‍याख्‍याते तर आहेतच पण प्रवचनकार पण आहेत.एकवेळ बाबांच्‍या प्रवचनाला सुरुवात होण्‍यापूर्वी आण्‍णांनी प्रास्ताविक करताना म्‍हटले,नामा म्‍हणे ग्रंथ श्रेष्‍ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥ असे संत नामदेव महाराज म्‍हणतात.‘’मी माझ्या जीवनात ज्ञानेश्‍वरीच्‍या १४ व्‍या अध्‍यायातील,२३४ क्रमांकाची ओवी अनुभवली’’.ती ओवी अशी आहे की,नगरेची वसावी। जळाशये निर्मावी । महावने लावावी । नानाविधे ॥ या ओवींने माझे संपूर्ण आयुष्‍यच बदलले.ग्रामविकासाच्‍या ध्‍येयाने मी झपटलो व त्‍यातूनच राळेगणसिध्‍दीसारखी गांवे उभी राहीली.ही ज्ञानेश्‍वर महाराजांची कृपा आहे.तसेच माऊलींच्‍या ज्ञानेश्‍वरीने झपाटलेले एक व्‍यक्‍तीमत्‍व माझ्यासमोर आहे,श्रीपाद बाबा चव्‍हाण.संपूर्ण महाराष्ट्रात त्‍यांचे परमार्थीक कार्य आहे.आम्‍ही त्‍यांना भाऊसाहेब या नावांने ओळखतो.आता त्‍यांचे ज्ञानेश्‍वरीवर उत्‍कृष्‍ट असे प्रवचन होईल व मी त्‍यांना प्रवचन सुरु करण्‍याची विनंती करतो.असे म्‍हणून अण्‍णांनीच ‘’हरे राम हरे राम राम राम हरे ‘’हे भजन सुरु केले.
श्रीपाद बाबांना व ज्ञानेश्‍वरीला अण्‍णांनी हार घातला ‘’पुंडलीक वरदे हरी विठठल ‘’हा गजर होऊन बाबांनी प्रवचन सुरु केले.सायंकाळी ४ते ५.३०दीडतास प्रवचन सुरु होते.समाजमंदीराच्‍या बाहेरसुध्‍दा श्रोते बसलेले,पिनड्रॉप सायलेंस प्रवचनासाठी बाबांनी ९ व्‍या अध्‍यायातील ७१ नंबरची ओवी प्रवचनास निवडली.
आमुचा प्रकृती पलीकडील भाव । जरी कल्‍पनेविण जागशी पावो । तरि मज माजी भूते हेही वावो । जे मी सर्व म्‍हणवूनी ॥
प्रवचनाच्‍या विषयाला अनुसरुन परीवर्तन व भगवंताच्‍या नामाची पावर सांगताना बाबा सांगतात,पूर्वी लोक म्‍हणायचे गु खावून उठला (म्‍हणजे पार वाया गेला)पण आता गुवांवरच स्‍वयंपाक करुन राहीले.पूर्वी शेणावर गोबरगॅस प्‍लॉंट चालायचे.शेणापेक्षा गुआमध्‍ये जास्‍त पावर आहे मंडळी हे आमच्‍या अण्‍णांनी संशोधन केले पहा संडासच्‍या टाकीचे पाईप गोबरगॅसला जॉइंट केले.शेणामध्‍ये आणि गुआमध्‍ये अग्‍नी नाही। प्रगट करायचे तंत्र माहित पाहिजे.किती पावर बाबा मग भगवंताच्‍या नामांत काही पावर असेल की नाही?अनुभव का म्‍हणाम्‍हणी हा ग्रंथ अनुभवाचा आहे कां म्‍हणाम्‍हणीचा?मघाशी अण्‍णांनी सांगीतले आपुला अनुभव,काय अनुभव यायला पाहीजे?देवाचा की प्रकृतीचा आम्ही प्रकृतीचे अनुभव सांगतो.माऊली म्‍हणतात आमुचा प्रकृती पलीकडील भावो.
प्रकृतीच्‍या पलीकडे कधी जाता येईल या प्रकृतीचा (देहाचा) विसर पडेल तेंव्‍हा जे बहुत एका अवांतरी । देहाची वरी आदरु । म्‍हणोनी पडीला विसरु । आत्‍मबोधाचा ॥ प्रकृतीचे पलीकडे जाण्‍यासाठी निर्वीकल्‍प व्‍हायचं.कल्‍पना अविद्या तेणे झाला जीव । मायोपाधीशिव बोलीजती ॥ कारण मीच सर्व नटलो असताना हे प्राणी किंवा जग आहे हे कल्‍पनेमुळे वाटते.ज्ञानेश्‍वरीतील खालील ६४ व ६५ नंबरची ओवी काय सांगते ते पहा-
माझीया विस्‍तारले पणाचेंनी नांवे । हे जगची नोव्‍हे आगवे । जैसे दुध मुराले स्‍वभावे । तरी तेची दही ॥ ६४ ॥ का बीजची जाहले तरु । अथवा भांगारची अळंकारु । तैसा मज एकाचा विस्‍तारु । ते हे जग ॥ ६५ ॥
प्रवचनाची सांगता झाल्‍यावर अण्‍णांनी आभार मानतांना कबूल केले की,आम्‍ही प्रकृतीमध्‍ये आडकलो म्‍हणून भाऊसाहेबांनी ही ओवी घेतली.दोघेही महात्‍मे एकमेकांना कडाडून भेटले.अण्‍णांसुध्‍दा सदगदीत झाले,बाबा म्‍हणतात अण्‍णां तुमच चाललय तेही बरोबर आहे.आज काळाची गरज आहे­.आम्‍ही परमार्थ मार्गातून दणका लावतो,तुम्‍ही सामाजिक कार्यातून लावा. यातूनच खरं समाजपरीवर्तन होईल.चहापाणी झाल्‍यानंतर दिंडी पिंडळणेरकडे ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत निघाली.मा.अण्‍णा गांवच्‍या बाहेर वारक-यांना बोळवत आले­.धन्‍य ते भाऊसाहेव व धन्‍य ते अण्‍णा.


१३] भ्रष्‍टाचार

एक राजा होता.त्‍याच्‍याकडं राणीनं विनंती केली की,माझ्या भावाला आपल्‍याकडे नोकरी द्या.त्‍याचे शिक्षण नसल्‍यामुळे पंचायत अशी झाली की,त्‍याला सामान्‍य नोकर म्‍हणून ठेवावे लागणार.मेव्‍हण्‍याला खालच्‍या पोस्‍टवर कामाला ठेवणे राजाला बरं नाही वाटले.बसून तरी पगार कसा द्यायचा,बिघडण्‍याची आता काय करावे? राजाला प्रश्‍न पडला कुठेतरी गुंतवायला पाहीजे म्‍हणून समुद्राच्‍या कडेला ज्‍या बंदरावर जहाजे लागायची तेथे याला लाटा मोजायला ठेवले.याने तेथेच भ्रष्‍टाचाराला सुरुवात केली.बंदरावर येणा-या जहाजाच्‍या कॅप्टनला म्‍हणायचा तुमच्‍या वारंवार येणा-या जहाजांमुळे माझ्या लाटा मोजण्‍यास गडबड होते.येथे जहाजे उभी करायची नाही दुसरे बंदर जवळपास नसल्‍यामुळे त्‍यांची पंचायत झाली.बर राजाचा मेव्‍हणा तक्रार करायची कोणी?मग जो तो त्‍याचेच पाय धरु लागला,साहेब काहीतरी चिरीमीरी घ्‍या,पण आमची जहाजे येथे लागू द्या.त्‍यालाही तेच पाहीजे होते.पण काही दिवसांनी राजाकडे त्‍याची तक्रार गेली.त्‍याला काय उपाय। कामावरुन काढून तरी कसं टाकणार.राणी नाराज होणार राजाने डोके चालवले त्‍याची पोस्‍टींग केली.सोयर उद्यापासून तुमची डयुटी समोरच्‍या टेकडीवर बसून विमानतळाकडे जाणारी विमाने मोजायची डयुटी चालू झाली.तेथेही तो चरायला कुरण शोधू लागला.त्‍याच्‍या लक्षात आले टेकडीजवळ काही बिल्‍डर बिल्‍डींग बांधण्‍याचे काम करत होते,याने त्‍यांना दम भरला पांच माळयापेक्षा उंच बिल्‍डींग होता कामाची नाही मला विमाने मोजायला अडथळा होतो.एखादे विमान मोजण्‍यात चूक झाली तर येथे भी प्रश्‍न निर्माण झाला.राजाचा मेव्‍हणा तक्रार कोणी करायची एका बिल्‍डरने म्‍हटले साहेब टेबलाखालून काही तरी घ्‍या पण आमच्‍या धंद्याचे नुकसान करु नका.द्या बिल्‍डींगमागे दहा लाख रुपये रेट फिक्‍स झाला.त्‍याला तर तेच पाहीजे होते,इथेही भ्रष्‍टाचार राजाकडे काही दिवसांनी तक्रार गेलीच.काय कराव याला हा जेथे जातो तेथे खातोच.राजाच्‍या डोक्‍यात आले आता आपण याला नजरे समोर ठेवू या त्‍या शिवाय याचा भ्रष्‍टाचार थांबणार नाही.सोयरं उद्यापासून आपण आमच्‍या राजवाडयाच्‍या दरवाजावर पहारा करायचा.विमाने मोजायची बंद करा.दोन दिवसाच्या डयुटीनंतर याला चैन पडेना येथे कुरण दिसेना चरायला.हो नां करता करता त्‍याला ते मिळालेच.राजाला भेटायले जे अधिकारी यायचे हा त्‍यांना भेटायचा व खोटचं सांगायचा महाराज मिटींगमध्‍ये आहेत.परवा या महाराजांना वेळ नाही आठवडयाने यां दहा हजार घ्‍या पण जाऊ द्या.त्‍याला पण दुसरे काय हवं असा भ्रष्‍टाचार त्‍याच्‍या रक्‍तातच मुरला होता.अशाप्रकारचे भ्रष्टाचारी अधिकारी देशाचे भल करणार कां स्‍वत:च?देश यांच्‍यामुळे फार रसातळाला चाललाय.जनता सुध्‍दा याला जबाबदार आहे.आपले काम लेट झाले तरी चालेल पण नियमाप्रमाणे करु कोणालाही लाच देणार नाही असा संकल्प करा देशाची प्रगती होईल.


१४] मामलेदार व तलाठी

बहीण भावांचं ठरलं होतें,तुझी मुलगी माझ्या मुलाला द्यायची.पण तेव्‍हा मुलं लहान होती.याचा मुलगा बारावी झाल्यावर ग्रामसेवक ट्रेनींग सेंटरमधून तलाठयाचा कोर्स पुर्ण करतो व एका गांवात तलाठी म्‍हणून नोकरीला लागतो.तीची मुलगी हुशार असते.ती शिक्षण घेऊन मामलेदार बनते.पण या दोन्‍ही मुलांची कळायला लागल्‍यापासून भेट झालेली नसते,कारण मुलीचं शिक्षणं दुस-या राज्‍यात झालेलं असतं.मामलेदारबाई त्‍या गावात दौ-याकरिता जाते तेव्‍हा तलाठी साहेबांचं बरचं काम पेंडींग असतं व त्‍यांच्‍याबद्दल ग्रामस्‍थांच्‍या ब-याच तक्रारी पण येतात.मामलेदारबाई तलाठयाची चांगली कानउघाडणी करते.
बहीण-भावाच्‍या इच्‍छेनुसार पुढच्‍याच महिन्‍यात या दोघांचा विवाह थाटामाटात पूर्ण होतो.आता पाहूणे मी तुम्‍हाला असं विचारतो,की बाईसाहेब जरी मामलेदार असल्‍या व हा तलाठी असला तरी वंशाचा वेल वाढण्‍यासाठी तिला याचेच पाय धरावे लागतील.तसं कितीही पंडीत विद्वान असला तरी त्‍याला अपरोक्षज्ञानासाठी संतांचेच पाय धरावे लागतील.संत विद्वान असतीलचं असं नाही.

जरी जाहले वेदशास्‍त्र संपन्‍न । परी तिही न करिता भगवद्भजन । मायानिवर्तक ब्रम्‍हज्ञान ।तयांसीही जाण कदा नुपजे ॥ (भागवत) आणिक नोहे माझ्या मना । हो का पंडीत शहाणा ॥ (तुकाराम महाराज)


१५] दांडेकर मामांचे कीर्तन

ज्या पुढा-यांचा व बुवांचा अवस्‍थेला विरोध होता त्‍यांनी वारकरी शिक्षण संस्‍था, आळंदीचे संस्‍थापक गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनाच कीर्तनाला बोलावलं.त्‍यांचा असा बेत होता की,मामांच्‍या तोंडूनच या गोष्‍टीचा निर्वाळा करायचा.सप्‍ताहात कीर्तन ठेवल होतं.मामासाहेब ठरलेल्‍या वेळेच्‍या अगोदरच संध्‍याकाळी चार वाजता घोटीला उतरले.त्‍यांची व माझी एस.टी स्‍टँडवर भेट झाली.तर त्‍यांच दर्शन घेतलं व चहा घेणार का म्‍हणून विनंती केली.शेजारीच एका हॉटेलमध्‍ये आम्‍ही बसलो.त्‍यांच्यासाठी मी दूध व माझ्यासाठीच चहा मागवला.चहा घेता घेता मी म्हटलं,मामासाहेब आपण ज्ञानेश्‍वरीच्‍या प्रस्‍तावनेत जो अष्‍टसात्‍वीकभावाचा विषय मांडलाय तो खरा आहे कां?ते म्‍हणाले खरा असल्‍याशिवाय लिहीलाय का?मी म्‍हटल,आज तुम्‍हाला ते खोटं आहे असं सांगण्‍यासाठी बोलवलय.मग तुम्‍ही काय सांगणार?मी म्हटलं.ते म्हटले, तुम्ही चहा पाजला म्हणून त्यांच्यासारखं बोलायचं हे मी जीवनात कधीच केले नाही व करणार ही नाही.मी काय मिंधा नाही कुणाचा सत्‍य जे आहे हेच सांगणार. संध्‍याकाळी मामासाहेब यांनी, सात्‍वीका भरणे रोमांसी दाटणे । स्‍वेदाचे जीवन येऊ लागे ॥ या एकनाथ महाराजांच्‍या अभंगावर कीर्तन केलं.ते कीर्तनातून म्‍हटले मी कुणाचा गडी नाही की तुम्‍ही म्‍हणाल ते सांगायला.तस्मात् शास्‍त्रं प्रमाणं ते कार्यकार्य व्‍यवि‍स्‍थतौ:याला म्‍हणतात निरपेक्षता व वैराग्‍य.संप्रदाय टिकवायला असे पठ्ठे लागतात.


१६] सबसे बडा कौन

एक साधू रस्‍त्‍याने जात होता व त्‍याच रस्‍त्‍याच्‍या कडेला एक शेतकरी पृथ्‍वी मातेची पूजा करता होता.तेव्‍हा त्‍या साधूने शेतक-याला विचारले क्‍या कर रहे हो। तेव्‍हा तो शेतकरी सांगतो,धरती मॉं की पूजा करता हुं,क्‍यों कि ये सबको अनाज देती हैं। ये सबसे बडी हैं इसलिए मैं इसकी पूजा करता हुं। तेव्‍हा तो साधू म्‍हणतो,पृथ्‍वी कायकी बडी । वो तो शेष माथे पे खडी ॥ तो बोले,हम शेष की पूजा करेंगे । शेष काय का बडा वो तो शंकरजी के गले में पडा। तो बोले हम भगवान शंकरजी की पूजा करेंगे।शंकर काय का बडा वो तो नंदी के उपर बैठा।तो हम नंदी की पूजा करेंगे.नंदी काय का बडा नंदी काय का बडा वो तो कैलास पर्वतपर खडा । फिर हम कैलास पर्वत की पुजा करेंगे। कैलाश कायका बडा कैलाश कायका बडा वो तो रावण ने तीन बार उखाडा । तो बोले हम रावण की पूजा करेंगे। रावण कायका बडा रावण काय का बडा वो तो वाली के बगल में का किडा । तो हम वाली की पुजा करेंगे । वाली कायका बडा वाली काय का बडा । उसको राम ने एक बाण से उखाडा । तो हम रामजी की पुजा करेंगे । राम कायका बडा राम कायका बडा वो तो वसिष्‍ठजी के चरणो में पडा।

तात्‍पर्य - सदगुरु शिवाय तरणोपाय नाही.सद्गुरु हेच सर्वात श्रेष्‍ठ आहेत.

प्रमाण - १} सकळ देवांचे दैवत । सद्गुरुनाथ एकला ॥
२} राम केला ब्रम्‍हज्ञानी ।वसिष्‍ठ मुनी तारक ॥ तुकाराम महाराज ॥


१७] संत संगतीचे महत्‍व

एक दिवस नारद महर्षी संतसंगतीचे महत्‍व जाणून घेण्‍यासाठी भगवान श्रीकृष्‍णाकडे जातात व देवाला विनंती करतात की,देवा मला सतसंगतीचे महत्‍व सांगा.तेंव्‍हा देव सांगतात,नारदा तुला संतसंगतीचे महत्‍व जाणून घ्‍यायचे असेल तर मी सांगतो त्‍या प्रमाणे कर.एका कुंपणावरती एक सरडा आहे.तु त्‍याच्‍याकडे जा आणि त्‍याला संतसंगतीचे महत्‍व विचार.नारद महर्षी त्‍या सरड्याकडे येतात व हात जोडून त्‍या सरडयाला विनंती करतात की,मला संतसंगतीचे महत्‍व सांगा.जेव्‍ह सरडयाची आणि नारदाची नजरानजर होते तेव्‍हा तो सरडा मरुन खाली पडतो.
नारदमुनी परत देवाकडे जातात व झालेला प्रकार सांगतात.तेव्‍हा देव सांगतो,त्‍या पिंपळाच्‍या वृक्षावरती एक पोपट आहे.त्‍याला तु संतसंगतीचे महत्‍व विचार.देवाने सांगितल्‍या प्रमाणे नारद परत त्‍या वृक्षाजवळ येवून पोपटाला विनंती करतात की,मला संतसंगतीचे महत्‍व सांगा.परंतु जेव्‍हा नारदाची आणि पोपटाची नजरानजर होते तेंव्हा तो पोपट मरुन नारदाच्‍या पायाजवळ पडतो.तेव्‍हा नारद परत देवाकडे जातात व झालेला प्रकार कथन करतात.तेव्‍हा देव सांगतात की,राजाला मुलगा झालेला आहे,त्‍याकडे जाऊन त्‍याला सतसंगतीचे महत्‍व विचार.
नारद देवाला म्‍हणला,देवा तुच का सांगत नाहीस,तेव्‍हा देव सांगतात,की तु जा तर खरं। देवाच्‍या भिडेखातर नारद तेथून निघतात व राजवाडयात जाताना मनात विचार करतात की,आतापर्यंत जे झालं त्‍याचं कुणीही विचारायला नव्‍हतं परंतु आता जर असं काही झालं तर आपली काही बरी गत होणार नाही.अशा घाबरलेल्‍या परिस्थितीत नारद राजमहालात येतात.नारद राजमहालात आलेले पाहुन राजा त्‍यांचे योग्‍य ते आदरातिथ्‍य करतो.क्षेमकुशल विचारतो.काय निमित्‍तानं येणं केल। असा प्रश्‍न विचारतो.
नारद मनात अत्‍यंत भयभीत असतात.परंतु तसे न दाखवता आपल्‍याला मुलगा झाल्‍याचं कळलं म्‍हणून भेटायला आलो असे सांगतात.त्‍या छोटया मुलाला नारदाकडे आणण्‍याची व्‍यवस्‍था करतात व आणून ते नारदाच्‍या मांडीवर देतात.नारद भितीने घाबरुन गेलेले असतात,परंतु धैर्य करुन त्‍या छोटया मुलाला संतसंगतीचे महत्‍व विचारतात आणि काय आश्‍चर्य त्‍या छोटया मुलाला वाचा फुटते आणि तो मुलगा नारदांना सांगू लागतो,महाराज संतसंगतीचे महत्‍व काय सांगावं.आपण पहिल्‍यांदा मला भेटलात तेंव्‍हा मी सरडयाच्‍या योनीत होतो.आपल्‍या अल्‍प संगतीने मी तत्‍काळ मुक्‍त झालो.मला पोपटाचा जन्‍म मिळाला.तेथेही आपल्‍या अल्‍पशा संगतीने मला मुक्‍ती मिळून मी हया ठिकाणी राजवाडयात जन्‍माला आलो आहे.हा अल्‍पशा संतसंगतीचा परीपाक आहे.

सिध्‍दांत : संत संगतीचे महत्‍व शब्‍दातीत वर्णनातील आहे.ते शब्‍दांनी किंवा वाचेने सांगता येण्‍यासारखे नाही.कारण संतसंगतीचे महत्‍व प्रत्‍यक्ष देवालाही सांगता येत नाही.म्‍हणून देवदेखील संतसंगतीची इच्‍छा करतो.

प्रमाण : १} देव इच्‍छी रज चरणांची माती । धावत चालती मागे मागे ॥ संत तु.
२} अर्धक्षण घडता संतांची संगती । तणे होय शांती महत्‍पापा ॥ संत तुकाराम
३} संत संगती वेगळे । तात्‍काळ पावावया माझे स्‍थान ।
आणिक नाहीच साधन॥ हे सत्‍य जाण उध्‍दवा ॥ भागवत ॥


१८] प्रशिक्षण (श्रीपादबाबांचा अनुभव)

कुत्रा वासावरुन चोर ओळखतो किंवा बॉम्‍ब शोधून काढतो,म्‍हणून महाराष्‍ट पोलीसांनी कुत्रे पाळलेत.पण त्‍यांना ट्रेनिंग माणसाने दिले आहे हे विसरुन चालणार नाही.तुमच्‍या गावाला नंदी बैलवाला येतो.खेळ करुन दाखवतो.एवढ्या पब्‍लीकमध्‍ये सखाराम पाटलाला जाऊन भेट म्‍हटल्‍यावर जिथ सखाराम पाटील बसला आहे त्‍याला जाऊन हा चाटतो व मान हलवतो.पाहीलं नाही तुम्‍ही,एवढच नाही त्‍याचा मालक जमिनीवर झोपत व नंदीबैलाला चारी पाय पोटावर ठेवायला लावतो.सांगा पाव्‍हणे अडीचशे किलोचा बँलंस तो बैल वरच्‍यावर सांभाळत नाही. पोटावर उभं राहून घाट्याघुंगरं वाजवत नाही.आता मी असं विचारतो,या देशात कुत्र्याला व बैलाला जर एवढी अक्‍कल आहे तर या सोन्‍यासारख्‍या माणसांना देवाबद्दल जी ट्रेनिंग दिल तर जमणार नाही।आम्‍ही म्‍हणतो यांची काय लायकी आहे.जनावरांपेक्षा नक्‍कीच जास्‍त आहे.सांगणारे लायक पाहीजेत अनुभवाचे पाहीजेत.

१९] रेल्‍वे अनौसिंग कशासाठी (श्रीपादबाबांचा अनुभव)

मी घाटकोपर स्‍टेशनला उभा होतो.कानावर आवाज येत होता.एक नंबर प्‍लॅटफॉर्मवर येणारी गाडी अंबरनाथला जाईल.सर्व स्‍टेशनवर थांबेल.तीन नंबर प्‍लॅटफॉर्मवर येणारी गाडी कर्जतला जाईल,ती फक्‍त ठाणे,डोंबवली,कल्‍याण याच स्‍टेशनवर थांबेल व पुढे सर्व स्‍टेशनांवर थांबेल.चार नंबरची गाडी छत्रपती शिवाजी टर्मीनला जाईल.ती घाटकोपर,कुर्ला,दादर भायखळा व बोरीबंदर (सीएसटी) इथेच थांबेल. सर्व प्‍लॅटफॉर्मवर डेस्‍टीनेशन बोर्ड इंडीकेटर पण मार्गदर्शन करत होते.मी बारकाईने पाहीले तर लोकांच याकडे लक्ष पण नव्‍हत,पण अनाउंसर आपली ड्युटी करत होता.त्‍याचं कारण रेल्‍वेचा धंदा हिंदुस्‍थानभर आहे.हिंदुस्‍थानच्‍या एखाद्या कानाकोप-यातून एखादा प्रवासी येथे नवीन येणार आहे असे गृहीत धरुन त्‍यासाठी ते मार्गदर्शन असतं.तुम्‍ही वारंवार तेच तेच काय सागता असं एकजण मला म्‍हणाला,तेव्‍हा त्‍याच्‍यासाठी हे सांगावं लागलं.राजाचं दवंडी द्यायच काम का कोतवाल करतो.त्‍याचप्रमाणे परमार्थातही कीर्तन प्रवचन,इत्‍यादी,बाबी परमार्थाचे अंतीम उद्दीष्टाप्रत जाण्‍यासाठीच असतात.


२०] अंगबळापेक्षा युक्‍ती महत्‍वाची

सुवेळाचळ पर्वताच्‍या युध्‍दभुमीवर सर्व वानरसैन्‍य राम-लक्ष्‍मणासह रात्रीच्‍यावेळी झोपी गेलं.हनुमंताने राम-लक्ष्‍मणाच्‍या भोवती आपल्‍या शेपटीचं वेष्‍टन केलें व जागे राहून संरक्षण करु लागले.रावणाने राम लक्ष्‍मणाला पळवून आणण्‍यासाठी अहीमही रावणाला नियुक्‍त केलें.राक्षसांना कपटवेष धारण करता येतात,तसेच सूक्ष्‍म रुप पण धरता येतं.गुप्‍त मार्गानं अही मही रावणाच्‍या नगरीत प्रवेश केला.राम-लक्ष्‍मणांना देवीच्‍या देवळात बळी देण्‍याची तयारी चालू होती.हनुमंतानं सूक्ष्‍म रुपानं मंदिरात प्रवेश केला.देवीला गचांडून मोरीत टाकलं.अंगाला शेंदूर फासून देवीच्‍या जागेवर बसले.
अही महीरावनांनी राम-लक्ष्‍मणांना मंदिराजवळ आणल्‍यावर हनुमंतरुपी देवीनं गर्जना करुन सांगितलं,हे माझ्या प्रिय भक्‍तांनो जे मानव तुम्‍ही धरुन आणलेत ते गवाक्षद्वारातून जिवंत आत टाकून द्या.मला त्‍यांना जिवंत खायचं आहे.राक्षसांनी आत टाकून द्या.मला त्‍यांना जिवंत खायचं आहे.राक्षसांनी तसंच केलं.हनुमंतराय गर्जना करुन म्‍हणतात,बोला आता तुम्‍हाला कोण वाचवील?आमचा हनुमंत असता तर नक्‍कीच वाचवलं असतं,राम-लक्षण म्‍हणाले.हनुमंताने त्‍यांना कडकडून मिठीच मारली.भक्‍त संकटात तेवहा देव सोडवतो व देव संकटात तेव्‍हा भक्‍त सोडवतो तसचं शक्‍तीपेक्षा युक्‍तीचं बळ अधीक असतं.राम-लक्षणांना हनुमंताने खांद्यावर घेतलं अही मही रावणाचा वध त्‍यांच्‍याकडून झाल्‍यावर आकाशपंथे युध्‍दभुमीवर त्‍यांना हनुमंत घेऊन आले.

पुढे वाचा